नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पुंछ भागात आज दहशतवाद्यांविरोधात लढताना लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाल्याची दुख:द घटना समोर आली आहे. आहे. सैन्याने हा पूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केल्याची माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
एका गावामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. मागील काही दिवसांपासून चार ते पाच दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याच्या माहितीच्या आधारे लष्कराने शोधमोहिम सुरू केली आहे. त्यांचा शोध घेत असलेल्या लष्कराच्या जवानांवर या दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. यामध्ये एक अधिकारी व चार जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांना वाचवण्यात यश आलं नाही
सोमवारी सकाळपासून दहशतवाद्यांविरोधात लष्करानं मोहिम हाती घेतली आहे. अनंतनाग आणि बांदीपोरा येथे लष्कराने प्रत्येकी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. बांदीपोरा येथे मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव इम्पियाज डार असून तो लष्कर ए तोयबाशी संबंधित असल्याचे समजते. अजूनही दहशतवादी व लष्करामध्ये चकमक सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मागील 15 दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला असून सात नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी गुरूवारी श्रीनगरमध्ये एका महिलेसह दोन शिक्षकांची हत्या केली. काश्मीरमध्ये 48 तासांच्या आत झालेली ही दुसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वीच एका औषध विक्रेत्यासह तीन नागरिकांची हत्या करण्यात आली आहे.
दोन शिक्षकांमध्ये एक काश्मिरी पंडित आणि एका शीख महिलेचा समावेश आहे. गुरूवारी सकाळी 11.15 च्या सुमारास श्रीनगर जिल्ह्यातील संगम ईदगाह येथील सरकारी शाळेतील दोन शिक्षकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले. महिला शिक्षिका शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. सुखविंदर कौर असं त्यांचं नाव आहे. मंगळवारी श्रीनगरमधील प्रसिध्द उद्योजक व औषध विक्रेते माखन लाल बिंद्रो यांची हत्या करण्यात आली होती. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास 70 वर्षीय बिंद्रो यांच्या दुकानातच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
बिंद्रो हेही काश्मिरी पंडित होते. 1990 च्या दशकात दहशतवादी कारवायांनी टोक गाठलेलं असतानाही बिंद्रो यांनी काश्मीर सोडले नव्हते. ते तिथेच राहून औषध दुकान चालवत होते. मंगळवारी बिंद्रो यांच्यासह आणखी दोघांची हत्या करण्यात आली होती. श्रीनगरमधील एक फळ विक्रेता व बंदीपुरातील एका नागरिकाचा त्यामध्ये समावेश आहे. ते मोहम्मद शफी असून येथील एका टॅक्सी स्टँडचे अध्यक्ष होते. तर फळ विक्रेत्याचे नाव विरेंदर पासवान असून ते बिहारचे रहिवासी होते.
प्रातिनिधिक फोटो