📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

नाफेड ने कांदा विक्री बंद करून कांदा खरेदी सुरू करावी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

राकेश आहेर | चांदवड देवळा

 नाफेडने कांदा विक्री बंद करून कांदा खरेदी सुरू करावी, जेणेकरून कांदा खरेदीमध्ये स्थिरता येईल. केंद्र सरकारने तातडीने हस्तेक्षप करून कांदा उत्पादक शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली. 

यावेळी देण्यात आलेल्या पत्रात राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, भारताचा सर्वाधिक कांदा हा बांग्लादेश आणि श्रीलंकामध्ये निर्यात होत होता. विशेषत: बांग्लादेश भारताच्या एकूण कांद्याच्या निर्यातीच्या ६० टक्के कांदा खरेदी करत होता. परंतु केंद्र सरकारचे आयात निर्यात बाबतींचे लहरी धोरण, अचानक निर्यात बंदी लावणे यासारख्या प्रकारास कंटाळून भारताला अद्दल घडविण्यासाठी म्हणून भारतीय कांद्याच्या आयातीस वेगवेगळे निर्बंध लावून भारताचा बांग्लादेशमध्ये आयात होणार नाही, याची दक्षता घेतली. तसेच इराककडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केला. आपली एक हक्काची बाजारपेठ गमावून बसलो आहोत. श्रीलंकेतील अंतर्गत यादवीमुळे तिथेही निर्यात बॅन आहे. तशातच दुष्काळात १३ वा महिना या म्हणीप्रमाणे नाफेडने कांदा खरेदी बंद करून आपलाच खरेदी केलेला कांदा स्थानिक बाजारात विकायला सुरू केली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव धडाधड कोसळू लागले आहेत. केंद्र सरकारने आता खडबडून झोपेतून जागे व्हावे आणि नाफेडचा कांदा विक्री बंद करून कांदा खरेदी सुरू करावी.तसेच अजून अडीच लाख टन कांदा खरेदी करावा आणि बांग्लादेश जर आमचा कांदा घेणार नसेल व कांद्याच्या निर्यातीस अडथळा आणत असेल तर बांग्लादेशातून आयात होणा-या कापड आणि तयार कपड्यांच्या आयातीत अडथळा निर्माण करावेत, तरच ख-या अर्थाने कांदा उत्पादकांना न्याय मिळेल, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने