हैदराबाद : आंध्र प्रदेशमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाने विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कर्नुल शहरातील वडगेरी भागात एक कुटुंब राहत होते या परिवारातील कोरोनाच्या भीतीने चार जणांनी कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली आहे, सुसाईड नोटमध्ये त्यांनी याबाबत उल्लेख केला होता. प्रताप (42), हेमलता ( 36 ), जयंत ( 17 ) आणि रिशिता (14) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. यामध्ये प्रताप हे टीव्ही मेकॅनिक होते. तर जयंत एक कोर्स करत होता आणि रिशिता इयत्ता सातवीमध्ये शिकत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य बुधवारी सकाळी घराबाहेर दिसला नाही. तसेच घराचा दरवाजाही उघडला नाही. त्यामुळे शेजारच्यांना संशय आला. त्यांनी दार वाजवल्यानंतरही काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर पोलिसांना बोलवण्यात आले.पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना चौघांचे मृतदेह आढळून आले. तसेच घटनास्थळावर पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये त्यांनी आत्महत्येचे कारण कोरोनाची भीती असल्याचे म्हटले आहे.
🔴 सुसाईड नोटमधून झाला धक्कादायक खुलासा
कुटुंबाने सुसाईड नोटमध्ये त्यांच्या मित्राचा आणि नातेवाईकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची भीती सतावत होती असे म्हटले आहे. याच भीतीमधून या संपूर्ण कुटुंबाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे.
करोना हा जीवघेणा आजार असला तरी तो योग्य उपचार व नियमांचे पालन केले तर त्यातून बरे होता येते व टाळताही येतो, सध्या 18 वर्षावरील सर्वांनाच सरकार तर्फे मोफत लसीकरण करण्यात येत आहे त्यामुळे बऱ्याच अंशी त्यावर ताबा मिळविण्यात भारत यशस्वी होणार आहे, त्यामुळे कोरोनाच्या भीतीने आत्महत्या करणे चुकीचे आहे, मालेगाव लाईव्ह तर्फे सर्व वाचकांना विनंती करण्यात येते की आपल्या सर्व नातेवाईकांशी चर्चा करा त्यांच्या मनातील संभ्रम दूर करा जेणेकरून अशा घटना टाळता येतील.
Tags
suicide